पालघर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
---
जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल
- दादाजी भूसे
पालघर(प्रतिनिधी) दि.26 :- कृषी, क्रिडा, शिक्षण, आदिवासी विकास अशा क्षेत्रा मधून पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिना निमित्त मूख्य शासकिय ध्वजारोहन पालकमंत्री श्री भूसे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये अष्टपैलू कामगीरी करुन पालघरचे भूमिपुत्र शार्दुल ठाकूर यांनी देशाला विजय प्राप्त करुन दिल्यामुळे शार्दुल ठाकूर यांना पालघर रत्न हा पुरस्कार पालकमंत्री श्री भूसे यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेवर आधारित "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियानाच्या माध्यमातून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी यावेळी करण्यात आली.
नगराध्यक्षा उज्वला काळे, खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरीक, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीक आदि उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये विविध कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फायदा झाला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांतीकारी योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून जिल्ह्यातील एकुण 1065 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अति दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपारिक भात, नाचणी व वराई ची शेती करतात. आदिवासी शेतकरी स्वतः आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रोबेरी झाडांची लागवड करून आपला आर्थिक स्थर उंचावला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 26,000 स्ट्रोबेरीच्या रोपांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली असून प्रती दिन 250 किलो स्ट्रोबेरीचे उत्पादन मिळत आहे. याची बाजारपेठेत प्रती किलो 200 रु. प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास 550 हेक्टर क्षेत्रावर मोगरा लागवड झाली आहे. यापासून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मोगरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे गट करून जव्हार येथे "वृंदावन पुष्प उत्पादक शेतकरी कंपनी" स्थापन करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांची फुले दादर-मुंबई बाजारपेठेत सकाळी लवकर पोहचत आहेत. शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता पिक पद्धतीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 7281 लाभधारकांनी विविध फळपिकांची 3558.07 हेक्टर वर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या मध्ये प्रामुख्याने काजूच्या जवळ पास 2 लाख कलमांची लागवड करण्यात आली आहे. एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत चिकू पिकाची राज्यस्तरावरून निवड करण्यात आली असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 25759 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 21195 घरे आज अखेर पूर्ण झालेली आहेत. याच बरोबर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि आदिम योजनेंतर्गत 6106 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली असून यापैकी 4006 घरकुले पूर्ण झालेली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत सन 2020-21 मध्ये 68,843 कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपात नळाने पाणीपुरवठा पुरविण्यासाठी कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कातकरी उत्थान अभियानंतर्गत खाजगी जागेवरील 3188 घरांचे, बन विभागाच्या जागेवरील 820 घरांचे, शासकीय जागेवरील 393 घरांचे, आणि गावठाण जागेवरील 2755 घरांचे अतिक्रमण नियमानाकूल करून आदिवासीच्या नावे करून दिली आहेत. जिल्हा वनहक्क समिती कक्ष स्थापन करून वनहक्क दावे मंजूरीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. जिल्ह्यात वनहक्क कायदयांतर्गत आजअखेर 44522 वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून त्याचे क्षेत्र 50385 एकर इतके आहे. मागिल 4 महिन्यात 4229 वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करून, आदिवासींना हक्क देण्यात आले आहेत. तसेच 437 सामुहिक वनहक्क दावे मंजूर असून त्याचे क्षेत्र 55 हजार 41 एकर इतके आहे.
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना पौष्ठीक अन्न माफक दरात मिळावे यासाठी शिवभोजन हि योजना चालू करण्यात आली होती या योजनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात 4,53,119 (चार लाख त्रेपन्न हजार एकशे एकोणीस) थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवभोजन केंद्रामधून प्रति दिन 2850 थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
"क्यार" व "महा" चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी 42,74,78000/ - (अक्षरी बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपये) इतके अनुदान शासनामार्फत वाटप करण्यात आलेले आहे. जुन ते ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये 25,58,52,000/-(पंचवीस कोटी अठ्ठावण्ण लाख बावन्न हजार रुपये) अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्यात मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 9,550( नऊ हजार पाचशे पन्नास) एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध करुन दिली आहेत. जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड 19,500 (एकोणीस हजार पाचशे) लस प्राप्त झाली असून 17,411 (सतरा हजार चारशे अकरा) व्यक्तींना लस देऊन उद्दिष्ठ गाठायचे आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करुन कोव्हिड रुग्णाच्या संख्येत नियत्रंण आणण्यात आले आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्ण बरे होण्यामध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात एकुण 45000 (पंचेचाळीस हजार) कोव्हिड रुग्ण आढळून आले होते. यापैकी 97 टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
********