*जिल्ह्यात विक्रमी लसीकरण केल्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन-जि.प.अध्यक्ष वैदेही वाढाण*
*लसीकरणाची गैरसोय होऊ नये - अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या सूचना*
पालघर (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शासनामार्फत मोफत लसीकरण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून लवकरच जिल्हा परिषद लसीकरणाचे आपले उद्दिष्ट पूर्ण करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत बुधवारी एकाच दिवशी पालघर जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी लसीकरण करून ६७ हजार ६५७ लसींचा टप्पा गाठल्याने अध्यक्षा यांनी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या विभागाची प्रशंसा करत त्यांना कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल अभिनंदनपर पत्र दिले.जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील कार्यालयात हे प्रसंशापर पत्र देण्यात आले. भविष्यात समोर ठेवलेले उद्दिष्ट लवकरच पूर्ण करून नागरिकांचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आणखीन मेहनत घ्यावी व जिल्हा वासीयांना दिलासा द्यावा असे आवाहन वाढाण यांनी केले.
तसेच सुरुवातीला जिल्ह्यात लस उपलब्धता कमी असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना अनेक गैरसोयी निर्माण झाल्या. मात्र आता लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या प्रयत्नांमुळे पालघर जिल्ह्याला मुबलक लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे यापुढे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी डॉ. सूर्यवंशी यांना केल्या. अध्यक्षांनी केलेल्या सूचनेनुसार नागरिकांसाठी सोयीची व सुलभ लसीकरण करू अशी ग्वाही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अध्यक्षांना यावेळी दिली.
No comments:
Post a Comment