*माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘बुडीत मजुरी देणे” योजना लाभदायक- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ*
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने जिल्हयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्यविषयक, शिक्षणविषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. अशाच विविध योजनांपैकी अनुसूचित जाती/जमाती/दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजूरी देणे ही एक महत्त्वपूर्ण आरोग्य विषयक योजना आहे.हि योजना सदर वर्गातील महिलांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. बाळंतपणात महिलांना आराम मिळावा, संस्थात्मक बाळंतपणास प्रोत्साहन मिळावे, मातामृत्युदर व बालमृत्युदर कमी व्हावा हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजने अंतर्गत "अनुसूचित जाती/जमाती/दारिद्रय रेषेखालील पात्र बाळंत महिलांना रू.४०००/- इतकी रक्कम बुडीत मजुरी म्हणून दिली जाते. २००० प्रसूती पूर्वी तर २००० प्रसूती नंतर दिले जातात. पालघर जिल्हयाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील अद्यापपर्यंत ४०७७ पात्र लाभार्य्यांकरिता एकूण रू.१६३.०८ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.. त्यापैकी ४०७३ मातांना आतापर्यत या योजनेचा लाभ मिळाला आहे. अशी माहिती मानव विकास चे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली आहे.
आदिवासी भागातील दारिद्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना बाळंतपणात पुरेसा आराम न मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर अशा महिलांकरिता मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेली "अनुसूचित जाती/जमाती/दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी देणे" ही योजना नक्कीच उल्लेखनीय ठरत आहे.
No comments:
Post a Comment