उल्हासनगरच्या तीन जीन्स कारखान्यांकडून साडेसात लाखांची वीजचोरी
मीटरमध्ये फेरफार; गुन्हे दाखल
कल्याण(प्रतिनिधी): 15 सप्टेंबर 2021
उल्हासनगर उपविभाग पाच अंतर्गत तीन जीन्स कारखान्यांची लबाडी महावितरणच्या कारवाईत उघडकीस आली आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करून या कारखान्यांनी साडेसात लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित जागा मालक व विजेचा चोरटा वापर करणाऱ्यांविरूद्ध अंबरनाथ पोलिस ठाण्यात वीजचोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. वीज चोरीसाठी मीटरच्या मागच्या बाजूस छिद्र करून वीज मापनाची वायर तोडण्याची सहज लक्षात न येणारी युक्ती या चोरटयांनी वापरली होती. परंतु संबंधित कारखान्यांच्या वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून (डाटा अनालिसिस) ही चोरी उघडकीस आली.
जागा मालक अर्जुन रामपाल चौरसिया आणि वीज वापरकर्ता लवकुशकुमार धर्मराज कुशवाह (57/1, ‘शॉप 4 वराक 1968, उल्हासनगर, 05) यांच्या कारखान्यात मीटरशी छेडछाड करून वीज चोरी सुरू असल्याचे आढळले. मीटरची गती 31.56 टक्के कमी करून या कारखान्याने एक लाख 34 हजार 280 रुपयांची 9 हजार 601 युनिट वीज चोरून वापरल्याचे आढळून आले. दुसरे ग्राहक रमेश मोतीराम लालवाणी व त्यांचे प्रतिनिधी हरेश शबल्दास कृष्णानी तसेच वीज वापरकर्ते विजय भिक्कुवाढेल यानी ओटी सेक्शन येथील त्यांच्या कारखान्याच्या मीटरमध्ये फेरफार करून 5 लाख 83 हजार 320 रुपयांची 43 हजार 721 युनिट वीज चोरुन वापरल्याचे निष्पन्न झाले. तर तिसऱ्या प्रकरणात अयुब नवाब खान याने त्याच्या गायकवाड पाडा येथील कारखान्याच्या मीटरशी छेडछाड करून 2 हजार 228 युनिट (31 हजार 350 रुपये) विजेची चोरी केल्याचे आढळून आले. तिन्ही कारखान्यात मीटरच्या संच मांडणीत फेरफार करून विजेच्या वापराची नोंद कमी करून महावितरणचे नुकसान करण्यात आले. सहायक अभियंता रोहिदास बरंडवाल यांच्या फिर्यादीनुसार सर्व संबंधितांवर वीज कायदा- 2003 च्या कलम 135 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय यादव, सहायक अभियंता बरंडवाल, कनिष्ठ अभियंता योगेश आटे, प्रधान तंत्रज्ञ निलकंठ राईचुरकर, जनमित्र प्रवीण आघळते, सुरेश गायकवाड, सहायक लेखापाल नीता ईसी, वरिष्ठ लिपिक सचिन माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment